: पुस्तक महिमा : लेखक : अरुण अशोक इंगळे

: पुस्तक महिमा :

आजच्या आधुनिक युगात संगणकीय क्षेत्रातील क्रांतीतून मानवी संपर्काची, दळण-वळणाचीव व्यवहाराची साधने यात आमुलाग्र बदल झाला आहे; कि त्यामुळे मानवी जीवनातही झपाट्याने परिवर्तन झाले परिवर्तनाने ज्ञानाच्या कक्षा वेगाने विस्तारल्या गेल्या . या क्रांतीतून किती फायदा झाला ? हा फार मोठा चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. कारण आजचा समाज या कारणांनी पुरता ढवळून निघालेला आहे. चहूकडे अस्थिर, संभ्रमित असे वातावरण तयार झालेले दिसत आहे. फेसबुक व व्हॉटसअॅप च्या जमान्यात माणसे पुरती डिजिटल झाली आहे. ऑनलाईनच्या नावाखाली माणूस माणसापासून कोसो दूर गेला आहे. ज्या माणसाने ज्याच्या जीवावर एवढी प्रगती केली. ज्या माणसाने ज्याच्या मदतीने आपली प्रगल्भता विद्वत्ता सिद्ध केली ज्याच्या संपर्काने स्वताला परिपुर्ण घडविले, त्या पुस्तकांनाच आज तो जवळ करेनासा झालाय.जर हि भोवतालची परिस्थिती बदलायची असेल. माणूस , माणसासाठी, माणसाजवळ आणायचा असेल तर ती ताकद माझ्या मते फक्त पुस्तक एके पुस्तक मध्येच आहे.तेच आपल्याला सावरू शकतात . जग कितीही बदलले तरी या पुस्तकांची किंमत इज्जत, तसूभरही कमी होणार नाही. पुस्तकांनी त्यांच्या स्वताच्या निर्मिती पासून ते आतापर्यंत सबंध मानव जातीला काय दिले? याची गणना किंवा मोजदाद कोणत्याच उपकरणाने करता येणार नाही किंवा पुस्तकाच्या स्तुती साठीचा शब्द जगातल्या कोणत्याच शब्द कोशात मावणार नाही.
      सबंध जगाला पुस्तकाने काय दिले याचा विसर आज जरी मानवाला पडला असेल, पण मला पुस्तकांच्या असलेल्या श्रद्धेपोटी आवर्जून सांगायला हवे कि, पुस्तकाने मला काय दिले. कारण मला घडवितांना , माझ्या विचारांना घडविणाऱ्या व सर्वांगीण विकास होण्यासाठी पोषण करणाऱ्या सकस अन्नाची भूमिका पुस्तकांनी बजावली आहे. जगातली सर्व माणसे माणसाप्रती कृतघ्न होवू शकतील पण ज्यांना आपण निर्जीव म्हणून हिणवतो अशी पुस्तके नेहमीच सबंध माणसाप्रती आजवर कृतघ्न राहिली आहे. फक्त प्रत्येक माणूस त्यांच्या सहवासात यायला हवा. म्हणजे माणसाच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहत नाही.
      लहानपणी शाळेत जायचो तेव्हा मोठ्या मोठ्या पुस्तकातली चित्रे पाहून मनाला आनंद व्हायचा. पण मन भरायचे नाही. त्यातली काही चित्रे स्वप्नातही यायची, बोलायची, अन मग पुन्हा कधी पुस्तक हाती पडेल याची अशी सतत ओढ लागायची , अशी न संपणारी ओढ पुस्तकाने दिली.
                जेव्हा गुरुजींनी चित्र आणि अक्षरे यांचा मेळ घालून दिला, तेव्हा कधी ही अक्षरे व बाराखडी पाठ झाली, हे ही कळले नाही. अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रींना उजळवून टाकणारी पहिली पायरी पुस्तकाच्या माध्यमातून मिळाली होती. हे थोडके नव्हे !
      विविध आकारातून अक्षरे, अक्षरातून शब्द, शब्दातून वाक्य, वाक्यातून परिच्छेद, परिच्छेदातून निर्माण होणारा धडा, धड्यातून होणारा अर्थबोध, सारे कसे जादुई होते. याच जादुई आविष्कारातून मेंदू बरोबरच मनाची मशागत घडत होती. शाळेतील मनोरंजनात्मक पुस्तके सोडली तर इतर पुस्तकेही शत्रूप्रमाणे वाटत होती. पण तरीही त्यांच्याशी जुळवून घेतांना गुणांबरोबर संस्कारांची बेरीजच होत गेली. लहान वयातच पुस्तकांचा माझ्याशी व माझा पुस्तकांशी परिचय झाला. आई-वडिलांच्या कष्टप्राय जीवनातून मिळणाऱ्या खाऊ पेक्षा त्यांनी आणून दिलेल्या पुस्तकांचा सुगंध काळजात रुजत गेला कारण त्यांना माहित असावे कि, आपल्या नंतर पुस्तकेच मुलांचे आयुष्य उभारू शकतात ते ! आणि जगातली अनेक महान विभूती, थोर व्यक्तिमत्वे त्यांच्या ग्रंथ प्रेमातूनच घडली असावी असेच बरेच काही पुस्तकातून निर्माण होणारे जग, माझ्या घरातून व शाळेतून मन: पटलावर लहान पणीच कोरले गेले होते असे निसर्गापासून ते विसार्गापर्यंत वेड लावले होते, पुस्तकांनी ! म्हणून तर पुस्तके मित्राप्रमाणे जिवलग कधी झाली, हा दिवस सांगणे तसे कठीणच.
      आज पुस्तकाने मला काय दिले ? असे लिहतांना माझे मन भारावून गेले आहे. माझ्या हृदयातून पाझरू लागलेत, भव्य विचारांचे फवारे. कारणआई-वडील व गुरुजींबद्दल जेवढे बोलावे तेवढाच आदर या पुस्तकांबद्दल माझ्या मनात खचून भरला आहे.
      जसे जगण्यासाठी माणसाला श्वास , पाणी, व अन्नाची आवश्यकता असते तशीच काहीशी गरज मला पुस्तकांची वाटते. जसा पाण्याविना मासा जगू शकत नाही, तसे माझं पुस्तकाविना होईल. म्हणून जीवनरूपी फुलांना पुस्तकांचा सुगंध असायलाच हवा.
      पुस्तकाने मला काय दिले ? हा प्रश्नजेव्हा जेव्हा मी माझ्या मनाला विचारला तर तेव्हा तेव्हा सर्व प्रथम उत्तर मिळाले ‘शब्द’ हो, पुस्तकाने शब्द दिले. तसे दिले शब्दातून विचार, विचारातून सुविचार, सुविचारातून प्रगल्भता, प्रगल्भतेतून समर्थता व समर्थेतून व्यक्तिमत्व पुस्तकाने दिले.
      तसं पाहता, पुस्तके मला भेटत गेली, शालेय परिपाठातून, वर्गपाठातून तसेच शाळेतील श्लोक, सुविचार, प्रार्थना, गाणी, बडबड गीते, व गोष्टी यातून पुस्तकांनी मला माझं समृद्ध बालपण दिलं. सोबतीला बागडणाऱ्या मित्राप्रमाणेच पुस्तकाने मित्रातही दिली. पुस्तकामुळे मी शिकत गेलो. इथली सभ्यता, इथली संस्कृती, इथली मानवी नितीमुल्ये, व त्याच प्रमाणे` शिकत गेलो विविध संस्कृतीचा – सभ्यतेचा आदर करायला. हे सारे करत असतांना सताड उघडी ठेवली मनाची, बुद्धीची कवाडे अन घालत गेलो एक एक टाका, विणत गेलो आयुष्य, साऱ्याच गोष्टीनं, कधी शरीराने, तर कधीमनानेही. . . आई-वडिलांचा आधाराचा हात सुटल्यावर पुस्तकाने माझ्या बाल पणाला भक्कम खोडाप्रमाणे आधार दिला.
      थोड्या कळत्या वयात पुस्तकांची जाडी वाढली, अन अक्षरांची जाडी कमी झाली तशी त्यांच्यातून सूक्ष्म अविष्कारांची, व दिव्य माणसांचीभेट झाली. अशा वेळी मनाला सतत प्रश्न पडायचा कि, हि माणस एवढे कस काय लिहतात ? यातूनच प्रेरणा घेवून घडत गेल्या मोडक्या–तोडक्या कथा-कविता; आणि मिळत गेली अमूल्य भेट पुस्तकातून . . .
      गणिताच्या आकृत्या, लांबी रुंदी, उंची-खोली, प्रमाणे जीवनाला आकार देत समजून घेतली माणसाची परिमाणे व गोळाबेरीजेच्या हिशोबाबरोबरच सुधारत गेली आयुष्याची चुकली-मुकली गणितेही. मग आवडू लागतात पुस्तके एका सजीवाप्रमाणे, अन भेटत जातात एकेक मनसे अगदी आपल्या सारखीच ती प्रत्येक क्षेत्रातली , कि ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रयत्नांची पराकाष्टा करून गाठली यशाची उत्तुंग शिखरे, तर कधी भोगली पराजयाची शृंखलाही. जशी साद मिळाली त्यांच्या पाउल खुणांची तसा मी चालत गेलो त्या मागणं ! अन वेचत गेलो त्यांचे अनमोल क्षण, स्वताच्या प्रगल्भतेसाठी ! तशी पुस्तकाने उघडी केली ज्ञानाची सर्वच महाद्वारेअन गळून पडली अहंकाराची वल्कले अगदी मुळापासून अन शोधत गेलो स्वताला अंतर्मुख होवून. हे शोधण दिलं मला माझ्या पुस्तकांनी, तसच उलगडत जात एकेक पान जगाच अन आपण ज्ञानसागराच्या अवकाशात विहार करू लागतो. ते विहार करणे दिलं मला पुस्तकानं. तसा सापडत जातो एक-एक हिरा , आपल्या ओंजळीत दान टाकणारा. त्यातले काही समाजासाठी जीव ओतून काम करणारे, समाजाची प्रश्ने मांडणारी, समाजाला तारणारी, सावरणारी, सामाजिक भान असलेली माणसे. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी, शिक्षणासाठी झटणारी शिक्षणतत्वज्ञ, शिक्षणमहर्षी, शिक्षणप्रेमी सापडतात.
      तशीच अनेक शोध लावणारे संशोधक, मानवाच्या विकासासाठी कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचणारी झपाटलेली वेडी माणस, खेळातली अधिक वेगवान , अधिक बलाढ्य, अधिक उंची गाठणारे , अधिक सफाईदार खेळणारे खेलरत्न वेगवेगल्या साहित्यातील कलेची जाण असलेले , कलेने जीवन समृध्द करणारी, ताल, सूर, लईत बुडालेली माणस , शब्दावर प्रेम करणारे – शब्दांचे पुजारी, शब्दांना जिवंत करणारे संजीवक व आपल्या लेखणीतून विविध विषयावर प्रतिभा फुलविणारे साहित्यिक,मानवतेचा संदेश देणारी, जगाला प्रेम अर्पण करणारी, मानवतेला जाणणारी, समतेच्या पातळीवर समाज घडवणारी संत मंडळी,  आपल्या शौर्याने, पराक्रमाने, कर्तुत्वाने, रणांगण गाजवणारी शूर मंडळी, आयुष्याचा क्षण क्षण वेचणारी, मानवाला निखळ आनंद देणारी, दुसऱ्याला हसवणारी, अंतर्मुख करणारी विविध क्षेत्रातली ज्ञानी कलावंत मंडळी . . . अशी अजून बरीच काही अंतकरणात घर करणारी माणसे दिलीत पुस्तकाने . . . किती जाणीवा, किती उणीवा, किती आठवणी, किती भविष्य, किती गोड, किती कटू, किती सुखदु:खाच्या, किती भावभावनांच्या अशा नानाविध प्रसंगाच्या, नानाविध व्यक्तिरेखांच्या, नानाविध प्रश्न-उत्तराचा खजिना दिला पुस्तकांनी. . .
शेवटी एवढेच म्हनावसं वाटतं की,
काय सांगू अजून मी, माझे शब्द झाले थिटे
माय-बाप काळजात, तशी पुस्तकेही भेटे.


जि. प. प्राथ. शाळा शिंगवे,
ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा. ९९२२४४१८९४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :